पंडिता रमाबाई जीवन व कार्य  -

लेफ्ट. डॉ. राज ताडेराव


प्रास्ताविक

           आधुनिक भारताच्या समाज सुधारणा चळवळीत पंडिता रमाबाई यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्या भारतातील सर्वात प्रभावशाली महिला सुधारकांपैकी एक असून सामाजिक कार्यकर्त्या आणि विद्वान म्हणून ओळखल्या जातात. देशाचा विकास हा स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून आहे हे ओळखून त्यांनी भारतीय विधवांच्या कल्याण आणि शिक्षणाला प्रोत्साहन दिले. स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. स्त्री सुधारणा चळवळी त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. ज्या काळात स्त्रीमुक्तीचा विचार करणेही अशक्य होते. त्या काळात स्त्रीमुक्तीचा मार्ग स्वतः अवलंबत शिक्षण, परदेश प्रवास आणि धर्मांतर असे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. अलौकिक सामाजिक कार्य, स्त्री शिक्षण व अध्यात्म या तीन गोष्टीचा वारसा रमाबाईंनी दिला. त्यांचे जीवन कार्य हे रूढी परंपरांना हादरे देणारे होते. अमुक एक क्षेत्र स्त्रियांची नाही, हे रमाबाईंना कधीच पटले नाही.

         पंडिता रमाबाईचे जीवन आणि कार्य ज्ञानाच्या परिवर्तनीय शक्तीची एकतेचे मूल्य आणि ज्ञानाच्या चिरंतन शोधाची आठवण करून देते. सामाजिक बंधने, अज्ञान आणि पूर्वग्रह यातून ज्ञान ही मुक्तीची गुरुकिल्ली आहे.  रमाबाईचा ठाम विश्वास होता की, शिक्षण हा अनेक सामाजिक आजारावर उतारा आहे. महिलांसाठी दर्जेदार शैक्षणिक संस्थाची कमतरता ओळखून त्यांनी ही दरी दूर करण्यासाठी पावले उचलली.

     पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबाईंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या १८८९च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबाईंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने ३० डिसेंबर १८८९च्या अंकात दिले आहे.

प्रारंभिक जीवन

       पंडिता रमाबाई यांचा जन्म कर्नाटक राज्यातील  गंगामूळ जिल्हा मेंगलोर येथे 23 एप्रिल 1858 रोजी झाला त्यांच्या वडीलाचे नाव अनंत शास्त्री व आईचे नाव लक्ष्मीबाई होते अनंत शास्त्री यांचे मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील माळहिरंजी जिल्हा रत्नागिरी असून ते वेद व संस्कृतचे पंडित असून ते पुरोगामी विचाराची भोक्ते होते त्याकाळी स्त्री शिक्षणास समाजाचा विरोध विरोध असतानाही त्यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई यांना संस्कृतचे शिक्षण दिले पत्नीला संस्कृत शिकविली म्हणून त्यांना समाजाने बहिष्कृत केले परंतु ते आपल्या विचारावर ठाम होते. रमाबाई सहा महिन्याच्या असतानाच अनंत शास्त्री आपल्या कुटुंबासह तीर्थयात्रेसाठी निघाले.

      अनंत शास्त्री यांनी पंडिता रमाबाईवर चांगले संस्कार केले तिलाही संस्कृत शिकवली. वयाच्या 12 व्या वर्षी रमाबाईंना धर्मग्रंथातील 18000 श्लोक तोंडपाठ होते त्या जागेवर संस्कृत काव्य करत. त्यांना मराठी गुजराती हिब्रू हिंदी बंगाली भाषा येत असत. पंधरा वर्षे तीर्थयात्रा केल्यानंतर हे कुटुंब मद्रास प्रांतात पोहोचले त्यावेळी भीषण दुष्काळ पडला होता या दुष्काळात अनंत शास्त्री व लक्ष्मीबाई चा मृत्यू झाला इथून रमाबाईच्या संघर्षमय जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आई-वडिलांच्या निधनामुळे रमाबाई थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई या भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालू ठेवली त्यात सहा महिन्यात थोरली बहीण कृष्णाबाईंचे निधन झाले.

          अनंत शास्त्री यांनी वेद व संस्कृतचे शिक्षण दिल्यामुळे रमाबाई व श्रीनिवास हे संस्कृत व धर्मग्रंथ धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक बनले. त्यांनी तीर्थ यात्रेत लोकांना पुराण सांगत व संस्कृत मधून व्याख्याने देत हे बहीण भाऊ भारतभर फिरत 1878 साली कलकत्त्या येथे पोहोचले. कलकत्ता शहरात त्यांच्या ज्ञानाची कदर करणारे लोक भेटले. कलकत्ता विद्यापीठाच्या पंडितांनी त्यांना आदराची वागणूक वागणूक दिली. रमाबाई आणि श्रीनिवास शास्त्रींच्या संस्कृत वरील प्रभुत्वांनी कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकीत झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता. त्या काळात एका स्त्रीचे संस्कृत वरील प्रभुत्व ही निश्चितच कौतुकाची बाब होती. त्यामुळे रमाबाईच्या ज्ञानाचा सन्मान करण्यासाठी कलकत्त्यातील विद्वत्त सभेने त्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले. स्त्रियांना पदव्या देण्याचा हा काळ नसताना सभेने पंडिता रमाबाईंना इ.स. 1878 मध्ये सरस्वती व बंगाली स्त्रियांनी आनंद मोहन बसू यांच्या नेतृत्वाखाली एक सभा भरवून त्यात रमाबाईंना एक मानपत्र अर्पण केले ते म्हणजे 'पंडिता' होय. अशा दोन पदव्या कलकत्ता येथे बहाल केल्या तेव्हापासून रमाबाई डोंगरे पंडिता रमाबाई सरस्वती या नावाने संपूर्ण भारतभर ओळखल्या जाऊ लागल्या.

         रमाबाईच्या कार्यामुळे मुंबईच्या एका दैनिकात पुढील बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यात 'हल्ली कलकत्त्यात रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळी चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते, तिचे वय 22 वर्षाचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही मुलगी संस्कृत भाषा कशी शिकली? बावीस वर्षे होऊनही ती अविवाहित कशी? मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही? असे अनेक प्रश्न पंडिता रमाबाई विषयी पुणे मुंबई शहरात विचारले जाऊ लागले.

वैवाहिक जीवन

          तीर्थयात्रेच्या निमित्ताने ढाक्यात असताना थोरले बंधू श्रीनिवासशास्त्री यांचे आजारपणाने 8 मे 1880 रोजी निधन झाले. दरम्यानच्या काळात पंडिता रमाबाई यांची शूद्र जातीतील पदवीधर व पुरोगामी विचाराच्या बिपीन बिहारीदास मेधावी या व्यक्तीशी ओळख झाली. त्यांनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली. 13 जून 1880 रोजी बांकीपूर शहरात नोंदणी पद्धतीने दोघांचा विवाह झाला. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रुढी विरुद्ध बंड पुकारले. लग्नानंतर सिल्लट येथे बिपिन बिहारीदास वकिली करू लागले. 16 एप्रिल 1881 रोजी त्यांना मुलगी झाली तिचे नाव मनोरमा ठेवण्यात आले. त्या काळात रमाबाईंनी नोंदणी पद्धतीने विवाह केल्यामुळे समाजात मोठी खळबळ उडाली होती. परंतु रमाबाईला वैवाहिक सुख फार काळ मिळाली नाही. लग्नानंतर केवळ 19 महिन्यांनी बिपिन बिहारी दास यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपली मुलगी मनोरमास घेऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्या व त्यांनी स्वतःला पूर्णतः समाजकार्याला वाहून घेतले.

       पंडिता रमाबाईच्या विरोधात पुण्यात प्रतिकूल वातावरण असतानाही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी त्यांना भावनिक आधार दिला याशिवाय पुण्यात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात रमाबाई रानडे व मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे यांनी पुढाकार घेतला होता.

ख्रिस्ती धर्माचा स्वीकार

 स्त्रियांच्या उद्धारासाठी अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हणून इ.स. 1883 मध्ये शिक्षण घेण्यासाठी पंडिता रमाबाई आपली मुलगी मनोरमासह इंग्लंडला गेल्या. भारतात असतानाच त्यांना हिंदू धर्मातील मूर्ती पूजा, पुजाऱ्यांचा दांभिकपणा, देवापर्यंत पोहोचण्यास लागणारे मध्यस्थ हे मान्य नव्हते. तसेच ख्रिस्ती धर्मातील मानवतावादी तत्त्वामुळे त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले होते. या सर्व परिणामातून त्यांनी 29 सप्टेंबर 1883 रोजी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. या घटनेमुळे त्यांच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. परंतु रमाबाईनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र रमाबाईंनी त्यांची तमा बाळगली नाही. हिंदू धर्म सोडला तरी भारतीयत्वाचा त्याग केला नाही. त्यामुळे धर्मांतरानंतरही त्यांच्या कार्याला अनेक समाजसुधारकांचा पाठिंबा होता. त्यामुळे काळाचा विचार करता त्यांचे बहुतेक निर्णय हे क्रांतिकारी होते. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी बायबलचा सखोल अभ्यास केला. बायबल ग्रंथातील ज्ञान मराठी महिलांना व्हावे म्हणून त्यांनी बायबलच्या भाषांतराचे काम केले.

सामजिक कार्य

       पंडिता रमाबाई यांचे जीवन हे आव्हानात्मक होते. स्त्रियांवर अनेक बंधने असतानाही त्यांनी स्वतःला सिद्ध केले. कर्मठ विचारांच्या लोकांना जुमानता, काळाची पावली उचलून हजारो स्त्रियांना आधार देऊन त्यांना स्वावलंबी बनविले. आधुनिक स्वतंत्र स्त्रीची अनेक रूपे रमाबाईच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेली होती. भारतीय समाजाचे अनेक बंधने असतानाही, पंडिता रमाबाईंनी संस्कृती ज्ञान मिळवले. पुरुष समुदायात सहजपणे वावरून संपूर्ण जगभर प्रवास केला. ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबाईंनी पुढाकार घेतला.

1. हंटर कमिशन समोर निवेदन

          ..1882 मध्ये ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू हंटर या शिक्षण तज्ञाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली होती.  या आयोगासमोर 1882 साली महात्मा ज्योतिराव फुले यांच्याप्रमाणे पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणाची गरज भक्कमपणे मांडली. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण मिळाले पाहिजे असा आग्रह त्यांनी मांडला.  पंडिता रमाबाई यांनी महिलांच्या शिक्षणाबद्दलची दिलेली साक्ष अतिशय महत्त्वपूर्ण होती. कारण या देशातील शंभरपैकी एकोणण्णव प्रकरणांमध्ये या देशातील सुशिक्षित पुरुषांचा स्त्रीशिक्षण आणि स्त्रियांच्या योग्य स्थानाला विरोध आहे. त्यांच्यात थोडाही दोष आढळल्यास ते स्त्रीचे चारित्र्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात.

         भारतातील महिलांची परिस्थिती अशी आहे की, महिलाच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करू शकतात, त्यामुळे भारतीय महिलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळायला हवा. ब्रिटिश सरकारने भारतीय स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी, कारण प्रचलित व्यवस्थेत महिला डॉक्टरची खूप गरज आहे. असे पंडिता रमाबाई यांनी मराठी भाषेत सुचविले. त्यांच्या साक्षीने सर हंटर प्रभावी झाले होते त्यांनी रमाबाईंच्या साक्षीचे पुढे इंग्रजी भाषांतर करून छापले. रमाबाईच्या भाषणामुळे व्हिक्टोरिया राणीला भारतात महिलासाठी दवाखाने सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

2. आर्य महिला समाज

         पतीच्या निधनानंतर रमाबाई विमनस्क अवस्थेत होत्या. काय करावे काही सुचत नव्हते. जवळ लहान मुलगी, आंतरजातीय विवाहामुळे सर्व समाज, नाते-गोती तुटलेली अशा वेळी न्यायमूर्ती रानडे, भांडारकर या महाराष्ट्रातील सुधारकांनी रमाबाई यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले. त्याचा स्वीकार करून त्या पुण्यात आल्या आणि त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना 1882 साली केली. या संस्थेवर येशू ख्रिस्त, ब्राह्मो समाज आणि हिंदू सुधारक यांच्या आदर्शाचा प्रभाव होता.

         आर्य महिला समाजाचा उद्देश स्त्रियांच्या शिक्षणाच्या कारणास प्रोत्साहन देणे आणि बालविवाहाच्या अत्याचारापासून मुक्ती हा होता. भारतीय स्त्रियांच्या प्रगतीसाठी पंडिता रमाबाई यांनी स्त्री सुधारणेच्या आवश्यकतेवर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. स्त्रियांना शिक्षणातून आत्मसन्मान देण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी केला. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे काढून त्यांनी सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अहमदनगर, ठाणे इत्यादी ठिकाणी आर्य महिला समाजाच्या शाखा स्थापन केल्या. या कार्यात त्यांना रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊतची आई या स्त्रियांची मदत मिळाली. इ.. १८८३ साली त्या आर्य महिला समाजाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या.

3. रमाबाई असोसिएशन

         पंडिता रमाबाई ह्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी इ.. १८८६ मध्ये अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारेद हायकास्ट हिंदू वूमन हे पुस्तक लिहिले. त्याचप्रमाणे भारतीय विधवा महिलांची शोषनिय स्थिती मांडणारी अनेक व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील स्त्रियांच्या समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. या व्याख्यानामुळे अमेरिकेत त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची छाप अमेरिकन लोकांवर पडली तेव्हा पंडिता रमाबाई यांच्या कार्यावर प्रभावित होऊन भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी एकत्र येऊन बॉस्टन येथे 13 सप्टे.1887 रोजीरमाबाई असोसिएशन या संस्थेची स्थापना करून रमाबाईला आर्थिक मदत केली. अमेरिकेत पैसे जमा करून दरवर्षी 5000 डॉलर भारतात पाठविण्यासाठी रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यात आली होती.. दरवर्षी डिसेंबर मध्ये असोसिएशनची सभा भरत असे. त्याच दिवशी रक्कम जमा केली जात असे. असोसिएशनच्या सभासदांनी दरवर्षी कमीत कमी एक डॉलर वर्गणी जमा करण्याचा नियम बनवण्यात आला होता. हा नियम दहा वर्षासाठी होता.

         दरम्यानच्या काळात पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेत स्त्रियांच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये एक कोर्स केला व बाल शिक्षणाच्या फ्रोबेल पद्धतीचा अभ्यास केला. अमेरिकेतील अनेक शिक्षण संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कार्यप्रणाली विषयी माहिती जाणून घेतली. अशी संपूर्ण आर्थिक व बौद्धिक तयारी करून इ.. 1889 मध्ये रमाबाई भारतात परतल्या.

         रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील ‘रमाबाई असोसिएशन’ने १० वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. १८९८ मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ या संस्थेच्या मदतीने रमाबाईंनी पुण्याजवळील केडगाव येथे ‘मुक्ती सदन’चे काम सुरू केले. त्यानंतर रमाबाईंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालवला.

4. शारदा सदन

        पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथील विल्सन कॉलेज जवळ शारदा सदन या संस्थेची स्थापना केली. निराधार भारतीय महिलांसाठी निधी गोळा करण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दौरे केले. या दौऱ्यातील जमा झालेल्या निधीतून त्यांनी बाल विधवासाठी शारदा सदन सुरू केले. सुरुवातीला दोन विद्यार्थिनी घेऊन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या सदनात आलेली पहिली मुलगी शारदा गद्रे हिच्या नावावरून या सदनाचे नाव शारदा सदन असे ठेवण्यात आले होते. हे सदन विधवा महिलांसाठी स्थापन करण्यात आले होते. शारदा सदन स्थापना समारंभाच्या अध्यक्षा काशीबाई कानिटकर होत्या. शारदा सदनमध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी मिस मेडन या शिक्षिका नेमण्यात आल्या होत्या.

         शैक्षणिक अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम अशा दोन स्वरूपात या संस्थेत अभ्यासक्रम उपलब्ध होता. शारदा सदन मुंबईत असताना या संस्थेच्या सल्लागार मंडळात पंडिता रमाबाई, डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, न्यायमूर्ती का. त्र्य. तेलंग, ना.म. चंदावार, सदाशिव वामन काणे, सदाशिव केळकर व रामचंद्र माडगावकर हे होते. नोव्हेंबर 1890 रोजी शारदा सदनचे स्थलांतर पुणे या ठिकाणी करण्यात आले. शारदा सदनच्या पुण्याच्या सल्लागार मंडळात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व गोपाळ हरी देशमुख हे होते. शारदा सदनच्या दुसऱ्या वर्धापन दिनी स्त्री पुरुष मिळावा घेण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षा पंडिता रमाबाई या होत्या. शारदा सदन मधील काही मुलींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता यातूनही या काळात बरेच वाद निर्माण झाले होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी तर शारदा सदनवर केसरी या वृत्तपत्रातून टीका केली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1893 ला शारदा सदन मधील विधवा गोदुबाई हिच्याशी विवाह केला. शारदा सदन पुण्याजवळ 34 मैलावर असणाऱ्या केडगाव या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

           शारदा सदन मध्ये विधवांना वाचन, लेखन, गणित, इतिहास, भूगोल, विणकाम, भरतकाम देऊन स्वावलंबी बनविण्याकडे शारदा सदनचा कल होता. स्त्रियांना घराच्या बाहेर पडून धीटपणे पुरुष सामुदायात वावरण्याची सवय लावणे, बाहेरच्या जगाचा परिचय करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास व व्यापक दृष्टी निर्माण करणे असे कार्य पंडिता रमाबाईंनी केले. पंडिता रमाबाई यांच्या प्रेमळ सहवासामुळे महिला शारदा सदन कडे ओढल्या जाऊ लागल्या. परंतु पुण्यातील कर्मठ विचारसरणीच्या लोकांनी शारदा सदनवर धर्मांतराचा ठपका लावला. त्यामुळे हळूहळू  समाज सुधारकांनी शारदा सदनच्या कार्यापासून अलिप्त राहणे पसंत केले.

5. मुक्ती सदन

          पंडिता रमाबाई यांनी पुण्यापासून 35 अंतरावर केडगाव येथे शंभर एकराच्या माळरानावर मुक्ती सदन या संस्थेची स्थापना केली. मुक्ती सदन या संस्थेच्या माध्यमातून विधवा आणि गरीब महिलांना साक्षर आणि आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी  पारंपारिक भारतीय शिक्षणाला पाश्चात्य शैक्षणिक प्रतिमानासह मिश्रित करून रमाबाईंनी एक अभ्यासक्रम तयार केला व महिलांना विविध व्यावसायिक कौशल्य  हस्तकलेपासून ते शेतीपर्यंत शिकवे.  ज्यामुळे त्या स्वयंपूर्ण बनू शकतील.  मुक्ती सदनमध्ये नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम होता. पारंपारिक भारतीय आणि पाश्चात्य शिक्षणावर भर दिला. त्यांनी मुक्ती मिशनच्या मर्यादे पलीकडे विविध सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर महिला शिक्षणाचे कारण पुढे केले.

        पंडिता रमाबाईची चिंता फक्त शिक्षणापूर्ती मर्यादित नव्हती तर, महिला समोरील बहुआयामी आव्हाने समजून घेऊन त्यांनी विविध कल्याणकारी उपाययोजना आश्रमात सुरू केल्या. बालवधू आणि विधवांच्या हक्कासाठी त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी संसाधने आणि समर्थन प्रदान केले. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखून त्यांनी मुक्ती सदन आणि इतर प्रयत्नाद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केले. ज्यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. मुक्ती सदनचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे जात, धर्म किंवा सामाजिक स्थान काहीही असले तरी गरजू असलेल्या कोणत्याही स्त्रीला येथे आश्रय मिळत असे.

        आश्रमातील फळे, भाज्या विकणे, हिशोब ठेवणे असे काम येथील महिला करीत असत. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर त्यांचा भर होता. त्यासाठी सर्वप्रथम एक छापखाना सुरू करण्यात आला. हातमाग, शेती, बुरुडकाम, विणकाम असे विविध कामे महिला करीत. त्याचप्रमाणे तेल काढणे. टोप्या, बटणे करणे, लेस विणणे, दोऱ्या वळणे, भांड्यावर नावे घालने अशी गरजेची सर्वच कामे आश्रमातील महिला करीत असत.  त्यामुळेच 10 मे 1910 च्या मुक्ती प्रेयरबेलच्या अंकामध्ये एनी ॲनी स्कॉट लिहितात 'मधमाश्या जशा जराही आळस न करता एकजुटीने मध गोळा करत असतात तशी इथे सतत काम करणाऱ्या महिला दिसतात.'   पंडिता रमाबाई सरकारी ऑर्डर घेऊन मुलींनी तयार केलेला माल पुरवित असत.

      1896 मध्ये आलेल्या भीषण दुष्काळात, रमाबाईंनी बैलगाड्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्रातील गावोगावी दौरे केले आणि हजारो बहिष्कृत मुले, बाल विधवा, अनाथ आणि इतर निराधार महिलांची सुटका केली आणि त्यांना मुक्ती मिशनच्या आश्रयाला आणले.

6. कृपा सदन

          लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या व पतीता म्हणून समाजाने नाकारलेल्या स्त्रियांचे पुनर्वसन करण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी इ.स 1899 साली केडगाव या ठिकाणी कृपा सदन या संस्थेची स्थापना केली. कारण दूवर्तनामुळे नींद ठरलेल्या पतीत स्त्रियांना तत्कालीन समाजात कोणतेच स्थान नव्हते. त्यांना कोणत्याही आश्रमात अनाथालयात जागा मिळत नसे. अशा पतीत स्त्रियांना प्रेमाने वागवून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना केली व समाजाने टाकून दिलेल्या या स्त्रियांना त्यांनी या सदनामध्ये सन्मानाने व प्रेमाचे जीवन दिले.

7. प्रीती सदन

 भारतीय समाजातील लंगड्या,  लुळ्या, अपंग, बहिऱ्या इत्यादी  महिलांना आधार देण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी प्रीती सदन या संस्थेची स्थापना केली.  कारण समाजात सर्वसामान्य स्त्रियांची त्या कालखंडात जी दुरावस्था होती. त्याचा विचार करता लंगड्या, लुळ्या, मुक्या, बहिऱ्या अशा स्त्रियांची स्थिती काय असेल? याचा विचारही करता येत नाही. अशा म्हाताऱ्या, दुबळ्या स्त्रियांसाठी पंडिता रमाबाई यांनी प्रीती सदन सुरू करून त्या महिलांना मायेचा आधार दिला.

8. सदानंद सदन

     पंडिता रमाबाई यांनी अनाथ मुलांसाठी सदानंद सदन या संस्थेची स्थापना केली. मुक्ती मिशन या संस्थेत हा स्वतंत्र विभाग होता. त्याचप्रमाणे या सदनमध्ये दुष्काळी भागातील मुले येत असत.

9. बातमी सदन

      पंडिता रमाबाई यांनी अंध मुलांसाठी बातमी सदन सुरू केले. बातमी सदन मधील अंधासाठी त्यांनी ब्रेल लिपीतील पुस्तके आणली. इतकेच नव्हे आपली कन्या मनोरमा हिला अंधाच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकविण्याची प्रेरणा दिली. बातमी सदनमध्ये अंधांना शिक्षणाबरोबर स्वेटर विणणे, वेताच्या खुर्च्या विणणे, केळीच्या सोपटाच्या टोपल्या तयार करणे, वाकांच्या दोऱ्या वळणे इत्यादी व्यवसाय शिकविले जात.

     बातमी सदन हा अंध मुली व स्त्रियांसाठी मुक्ति मिशन मध्ये हा स्वतंत्र विभाग होता. खऱ्या अर्थाने भारतातील अंधाची बातमी सदन हीच पहिली शाळा होती.

ग्रंथ संपदा 

         पंडिता रमाबाई यांचे साहित्य निर्मितीत महत्त्वाचे योगदान असून त्यांनी स्त्रीधर्मनीति (१८८२), द हायकास्ट हिंदू वूमन (१८८७-८८), इबरी (भाषेचे) व्याकरण (१९०८), नवा करार (१९१२), बायबल (मराठी भाषांतर), प्रभू येशू चरित्र (१९१३), भविष्यकथा (१९१७), अ टेस्टिमनी, मुक्त्ति प्रेअर बेल अँड न्यूज लेटर्स, फॅमिनएक्स्पिरिअन्स इन इंडिया इत्यादी ग्रंथाचे लिखाण केले असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना 1919 मध्ये कैसर--हिंद हा मानाचा किताब बहाल केला.

            बायबल या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला आहेत. हे भाषांतर केडगावातील छापखान्यातच छापले जात होते. एप्रिल १९२२ रोजी पंडिता रमाबाईंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठवले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला. त्यांनी जीवनभर जपलेला स्त्रीत्वाचा स्वाभिमान त्यांच्या मागेही त्यांच्या आश्रमातील महिलांनी कायम ठेवला. छापखान्यात काम करणाऱ्या मुलींनी त्यांची शवपेटिका आपल्या खांद्यावर वाहून कब्रस्तानापर्यंत नेली होती. तत्कालीन समाजात ही घटना खरोखरच क्रांतिकारीच म्हणावी लागेल.

संदर्भग्रंथ

1. Kosambi, Meera, Pandita Ramabai through Her Own Words : Selected Works, New Delhi, 2000.

1. टिळक, दे. ना., महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई, नासिक, 1960.

2. जोगळेकर मृणालिनी, स्त्री अस्मितेचा अविष्कार : पंडिता रमाबाई, भाग 1, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, 1991

3. भागवत विद्युत, स्त्री प्रश्नांची वाटचाल, प्रतिमा प्रकाशन, पूणे, 2004

4. बोर्ड खडसे, सुनिता, ऐतिहासिक परीप्रेक्ष्यातील स्त्रिया, शुभम पब्लिकेशन्स, पुणे 2010

Comments

Popular posts from this blog